राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा
7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य
🖊️प्रविण जगताप 🖊️वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा, दि 13 :वर्धा जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 2 हजार 172 प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य 7 कोटी 73 लक्ष 51 हजार 268 इतके आहे. न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदालतीचा मुख्य उद्देश आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोकअदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा शजिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष ए.एन.करमरकर यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थित पक्षकार तसेच अधिवक्ता यांना केले. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणा-या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद समोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले.
जिल्ह्यातील न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 238 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीची रक्कम 3 कोटी 81 लाख 35 हजार 434 रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी 934 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रककरणामधील तडजोडीचे मुल्य 3 कोटी 92 लाख 15 हजार 834 इतके होते. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकुण 2 हजार 172 इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकुण तडजोडीचे मुल्य 7 कोटी 73 लाख 51 हजार 268 इतके आहे.