कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची - माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी
कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची - माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी
बाभुळगावात शेतकरी मेळावा संपन्न
यवतमाळ, दि. ७ (जिमाका): कापूस पीक उत्पादन वाढीसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू तथा ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव डॉ. सी.डी. मायी यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साऊथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर आणि कृषी विभागाच्या संयुक्त सहकार्याने कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बंधन प्रकल्पांतर्गत बाभुळगाव तालुक्यातील श्री सिध्देश्वर शिव मंदिर, सरूड येथे शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. तसेच महमदपूर गावात ६० एकरवर पी.बी. नॉट बंधन बांधण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.
या मेळावाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शक सुभाषचंद्र आचलीया, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उ. नेमाडे, बाभुळगावचे तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, महमदपूरच्या सरपंच ज्योतीताई काळे, साउथ ऐशिया बायोटेक्नोलॉजी सेंटरचे डॉ. दीपक जाखर,, वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सहा. प्रा. डॉ. आर. डी. सातभाई आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना डॉ. सी. डी. मायी यांनी कापूस पिकातील यांत्रिकीकरणाचे महत्व सांगून पी.बी. नॉट टेक्नोलॉजी व उपयोग आणि आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी गाव पातळीवर शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित यावे. तसेच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत महमदपूर गावामध्ये राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट बंधन’ मधील आधुनिक तंत्रज्ञानाचा (पी.बी. नॉट टेक्नोलॉजी) कपाशी पिकासाठी सामूहिकरित्या अवलंब करण्याचे आवाहन केले.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उ. नेमाडे यांनी बंधन प्रकल्पाचे उद्देश व महत्त्व तसेच कापूस पिकाच्या वाढीसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे यांनी कृषी विभागाच्या शासकीय योजना व शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयी माहिती दिली.
या दरम्यान कीटकशास्त्रचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी सुरक्षित फवारणीसाठी घ्यावयाची काळजी व कापूस पिकावरिल कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
महमदपूरच्या सरपंच ज्योती काळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाशी संपर्कात राहून विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सुरक्षित फवारणी जनजागृती साठी सिजेन्टा कंपनीच्या वतीने निवडक शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी बाभूळगाव तालुका परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ मयूर ढोले तर आभार शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी व्यक्त केले.